Tuesday, 9 September 2025

गरम मसाला

गरम मसाला 
आपल्या रोजच्या  जीवनात भाज्या आणि  त्यांच्या  चवीला खूप महत्व आहे .
आणि त्या चवदार होण्यासाठी गरज असते मसाल्याची .............
आपण वापरत असलेले मसाले आपण बनवलेल्या जेवणाला चव आणतात .
मी गेले वीस वर्ष वापरात असलेला गरम मसाला .........
१ किलो शंकेशोरी मिरची 
अर्धा किलो धने 
आख्खी हळद  -१२५ ग्रम
खसखस -१२५ ग्राम
 बडीशेप-   १२५ ग्राम  
लाल मोहरी -१२५ ग्राम  
मिरे -२०० ग्राम 
लवंग -20 ग्राम 
दालचिनी --20 ग्राम 
मसाला वेलची --20 ग्राम 
साधी वेलची --20 ग्राम 
साधे जिरे --20 ग्राम 
शहाजिरे --20 ग्राम 
दगडफूल --20 ग्राम 
चक्री फुल --20 ग्राम 
मेथी --५०  ग्राम 
२ जायफळ --2
तमालपत्र--20 ग्राम 
सगळे मसाले आणि  मिरच्या आधी उन्हात ठेवून घ्याव्यात 
मंद आचेवर  सगळे मसाले  थोडे तेल टाकून वेगवेगळे भाजून घेव्यात 
मिरच्या देखील थोडे तेल टाकून भाजून घ्याव्यात.
कांडप मशीन वरून कुटून आणावा .
मसाला तिखट हवा  असेल तर अर्धा किलो तिखट मिरची घ्यावी .
परंतु मिरे प्रमाण कमी करावे १०० ग्राम घ्यावेत .
जर कांदा खोबरे हवे असेल तर या मधेच अर्धा किलो खोबरे .अर्धा किलो कापून 
सुकवलेला {वळवलेला } कांदा ,अर्धा किलो तीळ टाकावे .
परंतु या मुळे मसाला जास्त दिवस टिकत नाही .
मसाला बनवून झाल्यावर तो चीनी मातीच्या बरणीत किवा काचेच्या बरणीत 
ठेवावा .बरणी भरण्या आधी त्यात तळाला मीठ टाकावे .मसाला जास्त दिवस टिकतो.
मसाला  मध्ये अख्खा हिंग ठेवावा .





Saturday, 28 October 2023

व्यसन

कोणते व्यसन असो ते वाईटच मग ते कोणी करत असो.स्त्री की पुरुष...

आम्हाला हवे तसे आम्ही जगू असे बोलून आयुष्याला फाट्यावर मारणारे अनेक आहेत.आज काल कोणत्या गोष्टीची एन्जॉयमेन्टची कल्पना खूप बदलली आहे.कोणत्या गोष्टीची पार्टी म्हणजे ड्रिंक हवे असेच बघायला मिळते.जे ड्रिंक करत नाही त्यांना वेड्यात काढले जाते हे अनेकदा बघायला मिळते.

खरे काय खावे काय प्यावे ज्याचा त्याचा प्रश्न असतो.पण त्या गोष्टी करू नाही.त्या स्वतासाठी.आपल्या आरोग्या साठी.जर सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेले असते.आरोग्यास हानिकारक आहे तर ते खरच हानिकारक असते.म्हणून तर त्यावर तसे लिहिले असते.फक्त दुसरा कोणी पितो म्हणून मी पितो  किंवा पिऊन बघितली तर आपण आपल्या स्वतःच्या आरोग्या बरोबर खेळतो हे समजायला हवे.

शहरात लोक काही करतात म्हणून त्याचे अनुकरण खेड्यातील लोक करतात किंवा आजचे तरुण तरुणी करतात.असे बोलणे साफ चूक आहे.मान्य खेड्यातील लोकांना शहरी जीवनाचे कुतूहल असते.तेथील फॅशनचे वेड असते.म्हणून तो प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करत नाही.अपवाद कुठे नसतात तसे काही अपवाद ठरतात.

खेड्यातील मुलांना आपल्या परिस्थितीची नेहमी जाणीव असते.भले मग त्यांनी आधुनिक पोशाख जरी स्वीकारला असला तरी.फक्त काही फोटो बघून किंवा कोणाला एन्जॉय करताना बघून कोणी लगेच तसे करत नाही.जर तसे असते तर अनेक चित्रपट बघून कधी ते तसे वागले असते.

आपला नवरा परक्या बाई कडे जातो म्हणून स्वता ड्रिंक करणारी मीना कुमारीचा साहेब बीबी और गुलाम चित्रपट बघून कोणती बाई प्यायला लागली हे तर कधी बघितले नाही.अनेक बायकांचे नवरे हे दारू पिऊन 24 तास नशेत असतात.काही काम करत नाही.त्यांना त्यांची बायको सांभाळते.हे चित्र अनेक खेड्यात दिसते.म्हणून कोणती बाई नवरा पितो म्हणून ती पिते हे बघितले नाही.

मी एक छोट्या खेड्यातुन मुंबईत आले.दोन्ही जीवन पद्धती बघितल्या.दोन्ही मध्ये जमीन अस्मानचा फरक बघितला.खेड्यात वाढलेली मी अनेकदा भांबावून गेली.ग्रामीण जीवनातील झालेले संस्कार माणुसकी या शहरी जीवनात अनेकदा कुचकामी वाटले.पण आपल्यावर झालेले संस्कार अगदी खोल रुतलेले असतात.ते किती मोहाचे क्षण आले तरी सुटत नाही याचा अनुभव घेतला.
मी पूर्ण व्हेज तर आजूबाजुंल रोज नॉनव्हेज खाणारे.एवढेच नाही तर   त्यांच्या प्रत्येक प्रोग्रॅम मध्ये ड्रिंक केले जाते.अगदी बायका देखील.म्हणून मला कधी  वाटले नाही ते सगळे करावे.तुम्ही कोणाला किती फोल्लो करा किती कोणा बरोबर राहा त्याने फरक पडत नाही.

आज सरस मुली स्मोक करतात.ड्रिंक करतात.त्यांची त्याची आपली कारणे आहे.कोणाला त्यात थ्रिल वाटते.कोणाला गरज.मुंबई सारख्या शहरात अनेक ठिकाणावरून मुली येतात.एकट्या राहतात कधी कामाचे प्रेशर कधी सगळे झटपट मिळावे म्हणून स्वीकारलेले चुकीचे मार्ग.त्यातून आलेले डिप्रेशन .....टोकाचा एकटे पणा......मुंबईत भरपूर पैसे आहे.पण दुःख वाटून घेण्यास कोणाला वेळ नाही.सगळी दारे बंद......

खरे तर काही कारणे असले तरी कोणते व्यसन कधी अयोग्यच.मग ते कोणी करो.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह माझे आवडते ठिकाण ,अनेकदा येथे जाऊन बसते.अनेक तरुणाई येथे मोठ्या संख्येने येते.मी फक्त निरीक्षण करत असते.कोणी येऊन चुपचाप फक्त समुद्रा कडे बघत बसणारे.कोणी प्रचंड उत्साही.नकळत कानावर पडणारे संवाद........खूप काही सांगून जातात.मग माझेच मला जाणवते "आमच्या वेळी नव्हते असे काही हे वाक्य "खूप चूक आहे.कारण बदल .............

असेच मनातले काही

Wednesday, 25 October 2023

अंतिम संस्कार आणि समाज

आपल्या आजूबाजूला असणारे लोक .....कोणी श्रीमंत कोणी गरीब.कोणाचा बंगला कोणाचा फ्लॅट तर कोणाची झोपडी.अनेक विविधता...त्यानुसार ठरत असते माणसांची योग्यता ...हा समाज ठरवतो.

माणसाला मान त्याच्या हुशारी वर किंवा त्याच्यातील कलागुण वर मिळत नाही त्याला मान मिळतो त्याच्या कडे असलेल्या पैश्यावर नाही तर एक गाण्यासाठी लाख रुपये घेणाऱ्या एखाद्या गायक असतो.त्याच्या सारखे कोणी तरी गाणी गात भिक मागत असतात तेव्हा त्याची किंमत काही नाणे असते.मग तो किती छान गात असेल तरी.हे एक उदाहरण झाले.असे उदाहरण अनेक बाबतीत दिसून येतात.

रोज जगताना आपण तरी वेगळे काय करत असतो.आपण देखील एखदया मोठ्या प्रसिध्द असलेल्या व्यक्तीला मान देतो.तो मान त्या व्यक्तीला नसतो तर त्याच्या कडे असणाऱ्या गाडी,बंगला त्याच्या अंगावर असणाऱ्या कपड्यांना असतो.माणसाच्या अंगावर चांगले कपडे नसू द्या त्याला कोणी जवळ उभे करत नाहीत.

आपण शाळेत असतो शाळेचा एक ड्रेस कोड असतो.तेव्हा त्या निरागस वयात जास्त विषमता जाणवत नाही.कधी तिथे एखाद्याचे रूप त्याचे मळके कपडे त्याच्या पायात नसणारी चप्पल किंवा त्याच्या दफ्तर ची क्वालिटी यावरून काही त्यांच्यापासून अंतर ठेवून राहतात.

शाळा मागे पडते आयुष्याच्या शाळेत प्रवेश केला की सगळे बदलते.आधीच सधन असलेले पुढे जातात.गरिबीतून आलेले गरिबी पाचवीला पुजल्या सारखी असते ते गरीबच राहतात.खूप अपवाद असतात.शिक्षणाने त्यांचा कायपालट होतो.या सगळ्यातून ते बाहेर पडतात.

एकच वर्गात असणारे एकच बाकावर बसणारे पुढे जावून खूप सामाजिक अंतर सहन करतात.पैश्या अभावी शाळा सोडावी लागते नाही तर घरातील कोणाच्या तरी मनमानी मुळे सुटते. कुठे तरी काम करून पोट भरणे सुरू असते.आपल्या बरोबरची लोक पुढे गेले याचे दुःख असते.लग्न होते परस्थिती बदलते नाही तर तशीच राहते.नकळत कधीकधी वाईट संगत लागते.व्यसन सुरू होते ते वाढत जाते तेव्हा नकळत सामाजिक दरी वाढत जाते.लोक आपल्याला टाळतात ही भावना अजून व्यसनाधीन करते.मग ती वेळ येते घरातील लोकांना नकोसे होऊन जातात.असे अनेक जीव मग एक दिवस जग सोडून जातात.त्यांच्या जाण्यामुळे कोणाला काडीचा फरक पडत नाही.

असे लोक मात्र अनेक प्रश्न मनात निर्माण करतात.यांना लोक टाळतात याचे दुःख होत आसेल ना?आपला संसार चार लोकासारखा नाही याची खंत असेल का,?त्यांच्या मनात खूप काही असेल का?त्यांना लोकाबरोबर बोलावं वाटत असेल का?
असे लोक जातात जिवंत असताना पोटासाठी वाटेल ते काम करतात.अगदी मिळेल त्या मोबदल्यात.अनेक वर्षानुवर्ष एखाद्या ठिकाणी ते काम करत असतील तर त्यांच्या मृत्यू नंतर ते काम असतील तेथील लोकांना त्यांच्या बद्दल नक्की काय वाटतं असेल.ते त्यांना शेवटाचा निरोप तरी द्यायला जात असतील का?
असे लोक जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या अंत यात्रेत लोकांना जाण्याचा काडीचा रस नसतो.पण त्याच ठिकाणी एखादी मोठी व्यक्ती गेली तर हे लोक स्वतःहून जातात.येथे नाही गेले तरी कोणाच्या लक्षात येणार नसते तरी ही.

मुंबई सारख्या शहरात रेल्वे खाली येऊन बेवारस अनेक लोक मरतात.त्यांचा अंतिम संस्कार करण्याची मोठी जबाबदारी बी एम सी वर येते.अश्या वेळी कोणाला तरी पुढे जावं लागतं.हे सगळे बघून मुंबई पोलीस मधील एक महिला पोलिस हिने अश्या गोष्टी साठी पुढाकार घेऊन आज पर्यंत पाचशे पेक्षा जास्त लोकांचा अंतिम संस्कार केला आहे.ते कोण हे माहिती नसताना.
अश्या वेळी आपल्याला आजूबाजूला रोज दिसणारा एक व्यक्ती मृत्यू पावतो.पण त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या त्याला ओळखणाऱ्या लोकांना मात्र जावं वाटत नाही.हे खूप खटकते.

असेच मनातले काहीत

Saturday, 12 November 2022

आठवणी गावाकडील

आपण कुठल्यातरी नातेवाईक किंवा शाळेतील मित्रांच्या ग्रुप वर असतो.कधी कोणाचा वाढदिवस असतो तर कधी कोणी तरी गेल्याची बातमी.खरे तर वाढदिवसाचे काही अप्रूप वाटतच नाही कारण प्रत्येकच बालपण वाढदिवस कधी साजरे न करण्यात गेलेले असते.

कधी तरी अचानक कोणी गेल्याची बातमी ग्रुप वर येते.क्षणात आपले मन गावच्या गल्ली बोळात पोहचते.गेलेल्या व्यक्तीच्या घरा पर्यंत जाते.खरे तर मधल्या वर्षात खूप काही बदलले असले तरी आपल्या मनात मात्र ते जुने घर असते.

जी व्यक्ती गेली तिच्या घराच्या ओट्यावर तर कधी घरा समोरील झाडा खाली आपण कित्येकदा त्या व्यक्तीला बघितलेले असते.त्यांनी पण आपल्याला बघितलेले असते.कोणाची मुले असली तरी आपलीच मुले समजून त्याना दिलेले सल्ले किंवा त्यांचे प्रेम आठवते.

अचानक जेव्हा ते या जगातून जातात तेव्हा त्यांची ती रिकामी जागा कुठे तरी आपल्या मनाचा कोपरा रिकामा करून जाते.आठवत राहतात त्यांच्या आठवणी त्यांचे असणे.त्यांचे वागणे त्यांचे बोलणे.
जगराहाटी म्हणून जग तर चालूच राहते.कोणा एकाची जागा रिकामी करून.जाणीव करून देत असते त्याचा स्टॉप आला आपला कधी येईल.आयुष्याची क्षणभंगुरता मनाला खिन्न करते.

कोण आपण कुठून आलो कुठे जाणार माहिती नाही.या शरीराचे सगळे नाते गोते,शरीर संपले नाते संपले.कोणत्या तरी अंनतच्या प्रवासात निघून जाणारे पुन्हा भेटले तरी ओळख मात्र विसरून गेलेले असणार.
असेच मनातले काही

आठवणीतील माणसे(बाळू टेलर)

आठवणीतील  माणसं.

आजकाल रेडिमेड कपडे घेण्याची फॅशन जास्त आली आहे.टेलर्सची शिलाई परवडत नाही म्हणून अनेक जण रेडिमेड कपडे घेणे पसंत करतात.

आमच्या लहानपणी मात्र कपडे शिवूनच घेतले जायचे.रेडिमेड कपड्यांना 'आयतळे 'कपडे हा शब्द प्रयोग वापरला जायचा.आजच्या सारखे ते पर्फेक्ट मापाचे मिळत नव्हते.आठवडा बाजारात जास्त करून कापड दुकाने असायचे.रेडिमेड कपड्याचे दुकान कमी असायचे.

आजचे कॉटन म्हणजे तेव्हाचे मांजरपाट किंवा खळीचे कपड म्हणायचे.पॉलिस्टर महाग असल्यामुळे सगळयांना परवडत नव्हते.श्रीमंत असतील तेच पॉलिस्टर कापड घेत.आज उलट झाले आहे.कॉटन महाग झाले."वक्त वक्त की बात"

कापड घेतल्यावर ती शिवून घेण्यासाठी तेव्हाच्या भाषेत शिंपी शोधणे किंवा टेलर शोधणे सुरू व्हायचे.खरे तर गावात भरपूर टेलर्स होते.काही परंपरागत काम करणारे तर काही हा पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून करणारे.

असाच आमचा टेलर्स होता.बाळू नावाचा.
स्वभावाने अतिशय गरीब होता.राहायला तो मळ्यात राहायचा.गावाशेजारी त्यांचे शेत होते त्या शेतात त्यांचे घर होते.घरातील सगळ्यात मोठा मुलगा म्हणून घरातील बरीच जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती.

गावातील एका मातीच्या घरात त्याची मशीन होती.दिवसभर तो त्यावर काम करीत बसायचा.इतर वेळी त्या घरा समोरून जाताना तिकडे न बघणारे आम्ही मात्र नवीन कापड घेतली की त्याच्या दारात हजर व्हायचो.खरे तर फॅशन म्हणजे काय कसा बरोबर खातात हे माहिती नसणारे आम्ही.....गावात गणपती मध्ये एखादा  फुकट चित्रपट दाखवला की त्यातील नटी जसा ब्लाउज घालते (फुकट चित्रपट हे जास्त करून पौराणिक असायचे)म्हणून त्यात जास्त करून साडी नेसणारी नटी असायची.तिने घातलेल्या ब्लाउज सारखे अनेकजणी ब्लाउज शिवून घ्यायच्या.

आम्ही बाळू टेलर कडे जाऊन असेच वेगळे काही तर शिवून दे म्हणून मागे लागायचो.पंजाबी ड्रेसची फॅशन नव्हती.ज्याला आज गाऊन बोलतात तसे घेरदार मॅक्सी किंवा शर्ट आणि घेर असलेले लॉंग स्कर्ट(तेव्हा याला परकर पोलके म्हणत) शिवून घ्यायचो.

मंगळवारच्या बाजारात कापड घेतले की संध्याकाळी बाळू टेलरच्या दारात हजर व्हायचो.माप दिल्या पासून कधी देणार म्हणून सुरवात व्हायची.तो मोघम सांगायचा चार दिवसांनी या.चार दिवस कसातरी दम काढल्यावर पाचव्या दिवशी सकाळी त्याच्या दारात हजर व्हायचो.असे रोज म्हणून आठ दहा चक्कर मारल्यावर कुठे कपडे हातात मिळायचे.

बाळू एक माणूस आणि त्याच्या कडे खूप कपडे शिवायला येतात.एकाच मशीनवर काम करताना त्याला किती काम करावे लागते याची जाणीव नसल्यामुळे आम्ही कपडे उशिरा देतो म्हणून खूपदा बोललो आहे.तो मात्र नेहमी हसून देतो म्हणत राहायचा.

आज मुंबई सारख्या शहरात जेव्हा टेलर्स बघते तेव्हा बाळू आधी आठवतो.माप दिल्यावर असे शिवले तर तेवढे पैसे होतील बोलणारे.परवडत असेल तर शिवा ,हे बोलणारे.तेव्हा अनेकदा शिलाई न विचारता कपडे शिवल्यावर अनेक दिवस पैसे दिले नाही तर काही न बोलणारा बाळू आठवत राहतो.

अनेक वर्षे झाली बाळू सारखी अनेक माणसं भेटलीच नाही कधी तरी आठवणीतून ते बाहेर येत राहतात.कधी तरी ते आपल्या जगण्याचा एक भाग होते हे आठवत राहते.आज गाव बदलले मातीचे घरे गेली.गावचे साधेपणा त्या बरोबर हरवला.तरी गावात गेल्यावर मन कुठे तरी ओळखीच्या खुणा शोधत राहते.
असेच मनातले काही

आजची स्त्री आणि कुंकू


मी लहान असताना अनेकदा पाहिले ऐकले आहे.कोणी शुभ कामासाठी  निघाले आणि त्या वेळी एखादी विधवा स्त्री समोर आली.जर काम झाले नाही तर सरळ बोलत"अमुक पांढरा कपाळाची (अवदसा)समोर  आली.काम झाले नाही.
म्हणून अनेकदा विधवा स्त्रिया कधी समोर येत नसत.त्यांची जागा नेहमी घरात मागे असायची.

काळ बदलत गेला.स्त्रिया शिकल्या त्यांनी अनेक प्रथा धुडकावून लावल्या.आज स्त्रियांना शिक्षणामुळे समान अधिकार मिळाले.बुरसटलेल्या विचारातून त्या बाहेर आल्या.समाजाने बदल मान्य केले.मग ते स्वखुशीने असेल नाही तर नाईलाज म्हणून असेल  पण बदल झाले हे मात्र नक्की.

परंतु अलीकडे असे वाटते आपली वाटचाल पुन्हा मागे चालू झाली आहे समाज किती बदलला असे वाटत असले तरी काही टक्के असे आहेत त्यांना नवीन सुधारणा हव्या त्यांचा उपभोग घ्यायचा आहे आणि त्याच बरोबर स्त्रीने रूढी परंपरेत राहावे असे वाटत  आहे.अश्या वाटणाऱ्या लोका मध्ये बदल स्वीकारून आजचे स्वतंत्र उपभोगत असणारे समर्थन करतात तेव्हा हसावे की रडावे समजत नाही.

आज अनेक क्षेत्रात महिला पुढे आहेत.त्यांनी काय करावे काय नाही त्यांचा प्रश्न आहे.येथे समर्थन करणाऱ्या किती महिलांना त्यांच्या मुलीने जॉब वर असताना टिकली कुंकू लावून जावे वाटते.किंवा कोणी त्यांच्या कुंकू टिकली न लावणाऱ्या मुलींना असे बोलले तर चालणारे.

समाजाची एक गंमत असते कोणत्या गोष्टीचे समर्थन तो पर्यंतच जो पर्यंत सगळे उंबऱ्या बाहेर चालते.जेव्हा स्वतःवर किंवा स्वतःच्या परिवारा वर येते तेव्हा ते चूक असते.

प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे.व्यक्ती स्वतंत्र आहे.पण ते दुसऱ्याचे व्यक्ती स्वतंत्र हिरावून घेणारे नसावे.आणि अपमान करणारे नसावे.
असेच मनातले काही

गावाकडील आठवणी

कालच पौर्णिमा झाली.शहरात काय अमावस्या आणि पौर्णिमा...

माझे लग्नाआधीचे आयुष्य खेड्यात गेले.भरपूर मोठे अंगण होते.बहुतेक सगळे रात्री 9 पर्यंत झोपायचे.माझ्या घरा जवळून नाशिक शिर्डी रोड गेलेला होता म्हणजे आज ही आहे.रात्री 9 वाजता नाशिक सोलापूर गाडी आली की 9 वाजले समजायचे.कारण घरात घडयाळ नव्हते.

गावाच्या ज्या भागात मी राहायचे त्या भागात मी 10 वीला जाई पर्यंत लाईट नव्हत्या.गावातून गेलेल्या रस्त्यामुळे गाव दोन भागात विभागले गेले होते.एक बाजू म्हणजे गाव आणि दुसरी बाजू म्हणजे खळवाडी.

खळवाडी म्हणजे सगळे खळे....त्यातच घरं....घराच्या मागच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला शेतात आलेले पीक ठेवले जायचे.धान्य तयार करायला खळे असायचे.असे अनेक घरे मिळून खळवाडी.
म्हणून आमच्या बाजूला लाईट उशिरा आलेली.आज आठवते जेव्हा लाईटचे पोल नुसते आले तरी आम्ही आनंदाने नाचलो होतो.परंतु घरात लाईट मात्र घेतली नव्हती माझे लग्न झाले तरीही.

हे सगळे आठवले कारण खूप दिवसांनी मुंबईत काल पूर्ण चंद्र बघितला.जो चंद्र रोज बघायला मिळायचा त्याचे दर्शन मुंबईत मात्र दुर्लभ झाले आहे.चंद्राला चांदोबा,चांदो मामा म्हणायचो.तो लहान असताना खूप आवडायचा कारण पौर्णिमेच्या आधी चार पाच दिवस व नंतर चार पाच दिवस त्याचा लख्ख आणि शांत प्रकाश सगळी कडे पसरायचा.त्या प्रकाशात अंधार गायब होऊन जायचा.अंगणात खेळता यायचे.बसून गप्पा मारता यायच्या.शेजारच्या खळ्यात जाण्यास भीती वाटायची नाही.घरातील दिव्याच्या प्रकाशा पेक्षा बाहेर जास्त प्रकाश असायचा.

कोणा कडे टीव्ही नाही रेडिओ नाही.घड्याळ नाही.एकदा अंधार पडला की सगळे स्वतःच्या घरात गुडूप होऊन जायचे.9 ची गाडी आली म्हणजे खूप उशीर झाला असे वाटायचे.चंद्रप्रकशात आजूबाजूची झाडे,घरे स्पष्ट दिसायचे.सगळे कसे स्थितप्रज्ञ वाटायचे.एक वेगळी शांतता होती.जी कायमची हरवली आहे.

आज सगळी कडे नुसता प्रकाश आहे.रात्री दिवसाचा भास होतो.पण हरवला आहे तो चंद्र....तो प्रकाश 
विसरलो आहे पोर्णिमीची वाट बघणे.
कधी तरी आठवणी गावच्या गल्ली बोळात घेऊन जातात.इतकंच.
असेच मनातले काही

Thursday, 6 January 2022

बांगड्या भरणे(लग्नातील एक रीत)

"फुटकी काच यांची कधी माहिती नाही?" हे वाक्य अनेकांनी आपल्या आई आजीच्या तोडून नक्की ऐकले असेल.सून माहेरी गेली की बांगडया भरून आली पाहिजे अशीच काही रीत होती.दिवाळीत तर हमखास लेकी आणि बहिणी बांगडया भरूनच जात

जशी साडी हा स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तश्या बांगड्या हा देखील स्त्रीच्या आवडीचा विषय आहे.लग्नात मानपानाला फार महत्व असते.

जेव्हा घरात मुलाचे किंवा मुलींचे  लग्न असते.तेव्हा अनेक गोष्टी असतात त्यात बांगड्या भरणे हा एक सोहळा असतो(म्हणजे अलीकडे प्रमाण कमी झाले)खेड्यात अजून ही प्रथा आहे.

गावातील बांगड्या भरणारा कासार बोलावला जातो.मग तो आपल्या मोठया मोठया पिशवीतून बांगड्या घेऊन येतो.अनेक रंगांच्या ,अनेक डिझाईनच्या.सुंदर सुंदर बांगड्या.जावा,नंदा,मैत्रिणी शेजारी राहणाऱ्या महिला मग जमतात.जवळच्या त्या अगदी एक हातात दोन दोन डझन बांगडया घालून घेतात.मुद्दाम देखील घातल्या जातात.फुकट मिळतात म्हणून😂

काही फक्त मान म्हणून दोन दोन बांगड्या घालून घेतात.हा सोहळा जसा लग्न आधी होतो तसाच वधू माहेरी जाताना चुडा उतरवण्या वेळी होतो.नवरी आणि तिच्या करवल्या याना बांगड्या भरल्या जातात.

कधी काळी काचेच्या बांगड्या स्वस्त होत्या आता मात्र दीडशे पासून पाचशे पर्यंत डझन बांगड्या मिळतात.अलीकडे याचे बिल दहा हजराच्या पुढे जाते.म्हणून आता पूर्वी सारखा आग्रह केला जात नाही.अलीकडील मुली फार तर सहा बांगड्या पुढे बांगड्या घालत नाही.

पूर्वी जर बांगड्या साठी आग्रह केला नाही तर पुढील अनेक वर्ष  ऐकावे लागायचे."लग्नात लाख खर्च केला पण बांगडीची फुटकी काच नाही भरली"किती साधी माणसे आणि किती साधी अपेक्षा असायच्या ना??
अलीकडे लग्न म्हणजे इव्हेंट झाला.लग्न कमी आणि फोटो साठी केलेली प्रत्येक कृती जास्त वाटत असते.

आज आई कुठे काय करते या मालिकेत बांगड्या भरण्याचा एक सीन बघून आठवले.
असेच मनातले काही

मातेरे

मातेरे
 तू माझ्या आयुष्याचे मातेरे करून टाकले किंवा त्याने माझ्या आयुष्याचे पार मातेरे करून टाकले.हे वाक्य लहान असताना आजूबाजूच्या माणसा कडून खूपदा ऐकले आहे.खास करून महिला वर्गा कडून तर अनेकदा.

असे कोणी म्हटलं की मला लगेच आठवायचा तो मातेरा.काय असतो मातेरा.??शेतात जेव्हा कापणीला पीक यायचे तेव्हा ते कापताना काही कणसे खाली पडायचे.किंवा पाऊस आला पीक आडवे झाले तर हमखास त्याना माती लागायची.असे कणसे कुटल्यावर त्यात ती माती मिक्स व्हायची.धान्य कमी माती जास्त असे व्हायचे.

अनेकदा कापणी करताना मुळासह झाड उपटून यायचे त्याची माती मिक्स व्हायची.पूर्वी  कापणी करताना पडलेले कणसे देखील जमा करून आणायचे.एक धान्याचा कण वाया जाऊ द्यायचे नाही.म्हणून असे माती मिक्स झालेले धान्य त्याला मातेरा म्हणत.म्हणजे काय? चांगल्या धान्याची माती होणे.

शेतातील काम संपले की एखाद्या दिवशी नदीवर किंवा विहिरीवर हा मातेरा धुण्याचे काम चालायचे.माती मधील ते धान्य एका पातळ सुती कपड्यात जास्त करून फटके लुगडे यासाठी वापरले जायचे.त्या कपड्यात माती मधील धान्य टाकून दोन जणी ते झोळी दोन बाजूने पकडून पाण्यात बुडवायच्या पाण्यामुळे माती पाण्यात विरघळून जायची.असे खूपदा केले की माती पूर्ण निघून जायची आणि स्वच्छ धान्य खाली राहायचे.

मातेरा हा काही दर वर्षी निघत असे नाही.एखाद्या वर्षी जास्त असायचा मग तो धुण्याचा कार्यक्रम असायचा.आता कोणी  अश्या धान्य कडे बघणार नाही.जसे काही शब्द आता कालबाह्य झाले तसेच मातेरा कधीचा काल बाह्य झाला आहे.

जेव्हा कधी असे काही आठवते तेव्हा पूर्वीच्या महिला कशात स्वताला गुंतवून ठेवायच्या हे आठवते.चार दोन महिला एकत्र यायच्या मनापासून काम करायच्या एकत्र वेळ घालवायच्या.म्हणून त्यांच्या तोंडातून कधी बोर होते हे कधी बाहेर पडायचे नाही.

असेच आठवणीतील काही बाही.