आपण कुठल्यातरी नातेवाईक किंवा शाळेतील मित्रांच्या ग्रुप वर असतो.कधी कोणाचा वाढदिवस असतो तर कधी कोणी तरी गेल्याची बातमी.खरे तर वाढदिवसाचे काही अप्रूप वाटतच नाही कारण प्रत्येकच बालपण वाढदिवस कधी साजरे न करण्यात गेलेले असते.
कधी तरी अचानक कोणी गेल्याची बातमी ग्रुप वर येते.क्षणात आपले मन गावच्या गल्ली बोळात पोहचते.गेलेल्या व्यक्तीच्या घरा पर्यंत जाते.खरे तर मधल्या वर्षात खूप काही बदलले असले तरी आपल्या मनात मात्र ते जुने घर असते.
जी व्यक्ती गेली तिच्या घराच्या ओट्यावर तर कधी घरा समोरील झाडा खाली आपण कित्येकदा त्या व्यक्तीला बघितलेले असते.त्यांनी पण आपल्याला बघितलेले असते.कोणाची मुले असली तरी आपलीच मुले समजून त्याना दिलेले सल्ले किंवा त्यांचे प्रेम आठवते.
अचानक जेव्हा ते या जगातून जातात तेव्हा त्यांची ती रिकामी जागा कुठे तरी आपल्या मनाचा कोपरा रिकामा करून जाते.आठवत राहतात त्यांच्या आठवणी त्यांचे असणे.त्यांचे वागणे त्यांचे बोलणे.
जगराहाटी म्हणून जग तर चालूच राहते.कोणा एकाची जागा रिकामी करून.जाणीव करून देत असते त्याचा स्टॉप आला आपला कधी येईल.आयुष्याची क्षणभंगुरता मनाला खिन्न करते.
कोण आपण कुठून आलो कुठे जाणार माहिती नाही.या शरीराचे सगळे नाते गोते,शरीर संपले नाते संपले.कोणत्या तरी अंनतच्या प्रवासात निघून जाणारे पुन्हा भेटले तरी ओळख मात्र विसरून गेलेले असणार.
असेच मनातले काही
No comments :
Post a Comment