Thursday, 6 January 2022

मातेरे

मातेरे
 तू माझ्या आयुष्याचे मातेरे करून टाकले किंवा त्याने माझ्या आयुष्याचे पार मातेरे करून टाकले.हे वाक्य लहान असताना आजूबाजूच्या माणसा कडून खूपदा ऐकले आहे.खास करून महिला वर्गा कडून तर अनेकदा.

असे कोणी म्हटलं की मला लगेच आठवायचा तो मातेरा.काय असतो मातेरा.??शेतात जेव्हा कापणीला पीक यायचे तेव्हा ते कापताना काही कणसे खाली पडायचे.किंवा पाऊस आला पीक आडवे झाले तर हमखास त्याना माती लागायची.असे कणसे कुटल्यावर त्यात ती माती मिक्स व्हायची.धान्य कमी माती जास्त असे व्हायचे.

अनेकदा कापणी करताना मुळासह झाड उपटून यायचे त्याची माती मिक्स व्हायची.पूर्वी  कापणी करताना पडलेले कणसे देखील जमा करून आणायचे.एक धान्याचा कण वाया जाऊ द्यायचे नाही.म्हणून असे माती मिक्स झालेले धान्य त्याला मातेरा म्हणत.म्हणजे काय? चांगल्या धान्याची माती होणे.

शेतातील काम संपले की एखाद्या दिवशी नदीवर किंवा विहिरीवर हा मातेरा धुण्याचे काम चालायचे.माती मधील ते धान्य एका पातळ सुती कपड्यात जास्त करून फटके लुगडे यासाठी वापरले जायचे.त्या कपड्यात माती मधील धान्य टाकून दोन जणी ते झोळी दोन बाजूने पकडून पाण्यात बुडवायच्या पाण्यामुळे माती पाण्यात विरघळून जायची.असे खूपदा केले की माती पूर्ण निघून जायची आणि स्वच्छ धान्य खाली राहायचे.

मातेरा हा काही दर वर्षी निघत असे नाही.एखाद्या वर्षी जास्त असायचा मग तो धुण्याचा कार्यक्रम असायचा.आता कोणी  अश्या धान्य कडे बघणार नाही.जसे काही शब्द आता कालबाह्य झाले तसेच मातेरा कधीचा काल बाह्य झाला आहे.

जेव्हा कधी असे काही आठवते तेव्हा पूर्वीच्या महिला कशात स्वताला गुंतवून ठेवायच्या हे आठवते.चार दोन महिला एकत्र यायच्या मनापासून काम करायच्या एकत्र वेळ घालवायच्या.म्हणून त्यांच्या तोंडातून कधी बोर होते हे कधी बाहेर पडायचे नाही.

असेच आठवणीतील काही बाही.

No comments :

Post a Comment