Saturday, 12 November 2022

आठवणी गावाकडील

आपण कुठल्यातरी नातेवाईक किंवा शाळेतील मित्रांच्या ग्रुप वर असतो.कधी कोणाचा वाढदिवस असतो तर कधी कोणी तरी गेल्याची बातमी.खरे तर वाढदिवसाचे काही अप्रूप वाटतच नाही कारण प्रत्येकच बालपण वाढदिवस कधी साजरे न करण्यात गेलेले असते.

कधी तरी अचानक कोणी गेल्याची बातमी ग्रुप वर येते.क्षणात आपले मन गावच्या गल्ली बोळात पोहचते.गेलेल्या व्यक्तीच्या घरा पर्यंत जाते.खरे तर मधल्या वर्षात खूप काही बदलले असले तरी आपल्या मनात मात्र ते जुने घर असते.

जी व्यक्ती गेली तिच्या घराच्या ओट्यावर तर कधी घरा समोरील झाडा खाली आपण कित्येकदा त्या व्यक्तीला बघितलेले असते.त्यांनी पण आपल्याला बघितलेले असते.कोणाची मुले असली तरी आपलीच मुले समजून त्याना दिलेले सल्ले किंवा त्यांचे प्रेम आठवते.

अचानक जेव्हा ते या जगातून जातात तेव्हा त्यांची ती रिकामी जागा कुठे तरी आपल्या मनाचा कोपरा रिकामा करून जाते.आठवत राहतात त्यांच्या आठवणी त्यांचे असणे.त्यांचे वागणे त्यांचे बोलणे.
जगराहाटी म्हणून जग तर चालूच राहते.कोणा एकाची जागा रिकामी करून.जाणीव करून देत असते त्याचा स्टॉप आला आपला कधी येईल.आयुष्याची क्षणभंगुरता मनाला खिन्न करते.

कोण आपण कुठून आलो कुठे जाणार माहिती नाही.या शरीराचे सगळे नाते गोते,शरीर संपले नाते संपले.कोणत्या तरी अंनतच्या प्रवासात निघून जाणारे पुन्हा भेटले तरी ओळख मात्र विसरून गेलेले असणार.
असेच मनातले काही

आठवणीतील माणसे(बाळू टेलर)

आठवणीतील  माणसं.

आजकाल रेडिमेड कपडे घेण्याची फॅशन जास्त आली आहे.टेलर्सची शिलाई परवडत नाही म्हणून अनेक जण रेडिमेड कपडे घेणे पसंत करतात.

आमच्या लहानपणी मात्र कपडे शिवूनच घेतले जायचे.रेडिमेड कपड्यांना 'आयतळे 'कपडे हा शब्द प्रयोग वापरला जायचा.आजच्या सारखे ते पर्फेक्ट मापाचे मिळत नव्हते.आठवडा बाजारात जास्त करून कापड दुकाने असायचे.रेडिमेड कपड्याचे दुकान कमी असायचे.

आजचे कॉटन म्हणजे तेव्हाचे मांजरपाट किंवा खळीचे कपड म्हणायचे.पॉलिस्टर महाग असल्यामुळे सगळयांना परवडत नव्हते.श्रीमंत असतील तेच पॉलिस्टर कापड घेत.आज उलट झाले आहे.कॉटन महाग झाले."वक्त वक्त की बात"

कापड घेतल्यावर ती शिवून घेण्यासाठी तेव्हाच्या भाषेत शिंपी शोधणे किंवा टेलर शोधणे सुरू व्हायचे.खरे तर गावात भरपूर टेलर्स होते.काही परंपरागत काम करणारे तर काही हा पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून करणारे.

असाच आमचा टेलर्स होता.बाळू नावाचा.
स्वभावाने अतिशय गरीब होता.राहायला तो मळ्यात राहायचा.गावाशेजारी त्यांचे शेत होते त्या शेतात त्यांचे घर होते.घरातील सगळ्यात मोठा मुलगा म्हणून घरातील बरीच जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती.

गावातील एका मातीच्या घरात त्याची मशीन होती.दिवसभर तो त्यावर काम करीत बसायचा.इतर वेळी त्या घरा समोरून जाताना तिकडे न बघणारे आम्ही मात्र नवीन कापड घेतली की त्याच्या दारात हजर व्हायचो.खरे तर फॅशन म्हणजे काय कसा बरोबर खातात हे माहिती नसणारे आम्ही.....गावात गणपती मध्ये एखादा  फुकट चित्रपट दाखवला की त्यातील नटी जसा ब्लाउज घालते (फुकट चित्रपट हे जास्त करून पौराणिक असायचे)म्हणून त्यात जास्त करून साडी नेसणारी नटी असायची.तिने घातलेल्या ब्लाउज सारखे अनेकजणी ब्लाउज शिवून घ्यायच्या.

आम्ही बाळू टेलर कडे जाऊन असेच वेगळे काही तर शिवून दे म्हणून मागे लागायचो.पंजाबी ड्रेसची फॅशन नव्हती.ज्याला आज गाऊन बोलतात तसे घेरदार मॅक्सी किंवा शर्ट आणि घेर असलेले लॉंग स्कर्ट(तेव्हा याला परकर पोलके म्हणत) शिवून घ्यायचो.

मंगळवारच्या बाजारात कापड घेतले की संध्याकाळी बाळू टेलरच्या दारात हजर व्हायचो.माप दिल्या पासून कधी देणार म्हणून सुरवात व्हायची.तो मोघम सांगायचा चार दिवसांनी या.चार दिवस कसातरी दम काढल्यावर पाचव्या दिवशी सकाळी त्याच्या दारात हजर व्हायचो.असे रोज म्हणून आठ दहा चक्कर मारल्यावर कुठे कपडे हातात मिळायचे.

बाळू एक माणूस आणि त्याच्या कडे खूप कपडे शिवायला येतात.एकाच मशीनवर काम करताना त्याला किती काम करावे लागते याची जाणीव नसल्यामुळे आम्ही कपडे उशिरा देतो म्हणून खूपदा बोललो आहे.तो मात्र नेहमी हसून देतो म्हणत राहायचा.

आज मुंबई सारख्या शहरात जेव्हा टेलर्स बघते तेव्हा बाळू आधी आठवतो.माप दिल्यावर असे शिवले तर तेवढे पैसे होतील बोलणारे.परवडत असेल तर शिवा ,हे बोलणारे.तेव्हा अनेकदा शिलाई न विचारता कपडे शिवल्यावर अनेक दिवस पैसे दिले नाही तर काही न बोलणारा बाळू आठवत राहतो.

अनेक वर्षे झाली बाळू सारखी अनेक माणसं भेटलीच नाही कधी तरी आठवणीतून ते बाहेर येत राहतात.कधी तरी ते आपल्या जगण्याचा एक भाग होते हे आठवत राहते.आज गाव बदलले मातीचे घरे गेली.गावचे साधेपणा त्या बरोबर हरवला.तरी गावात गेल्यावर मन कुठे तरी ओळखीच्या खुणा शोधत राहते.
असेच मनातले काही

आजची स्त्री आणि कुंकू


मी लहान असताना अनेकदा पाहिले ऐकले आहे.कोणी शुभ कामासाठी  निघाले आणि त्या वेळी एखादी विधवा स्त्री समोर आली.जर काम झाले नाही तर सरळ बोलत"अमुक पांढरा कपाळाची (अवदसा)समोर  आली.काम झाले नाही.
म्हणून अनेकदा विधवा स्त्रिया कधी समोर येत नसत.त्यांची जागा नेहमी घरात मागे असायची.

काळ बदलत गेला.स्त्रिया शिकल्या त्यांनी अनेक प्रथा धुडकावून लावल्या.आज स्त्रियांना शिक्षणामुळे समान अधिकार मिळाले.बुरसटलेल्या विचारातून त्या बाहेर आल्या.समाजाने बदल मान्य केले.मग ते स्वखुशीने असेल नाही तर नाईलाज म्हणून असेल  पण बदल झाले हे मात्र नक्की.

परंतु अलीकडे असे वाटते आपली वाटचाल पुन्हा मागे चालू झाली आहे समाज किती बदलला असे वाटत असले तरी काही टक्के असे आहेत त्यांना नवीन सुधारणा हव्या त्यांचा उपभोग घ्यायचा आहे आणि त्याच बरोबर स्त्रीने रूढी परंपरेत राहावे असे वाटत  आहे.अश्या वाटणाऱ्या लोका मध्ये बदल स्वीकारून आजचे स्वतंत्र उपभोगत असणारे समर्थन करतात तेव्हा हसावे की रडावे समजत नाही.

आज अनेक क्षेत्रात महिला पुढे आहेत.त्यांनी काय करावे काय नाही त्यांचा प्रश्न आहे.येथे समर्थन करणाऱ्या किती महिलांना त्यांच्या मुलीने जॉब वर असताना टिकली कुंकू लावून जावे वाटते.किंवा कोणी त्यांच्या कुंकू टिकली न लावणाऱ्या मुलींना असे बोलले तर चालणारे.

समाजाची एक गंमत असते कोणत्या गोष्टीचे समर्थन तो पर्यंतच जो पर्यंत सगळे उंबऱ्या बाहेर चालते.जेव्हा स्वतःवर किंवा स्वतःच्या परिवारा वर येते तेव्हा ते चूक असते.

प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे.व्यक्ती स्वतंत्र आहे.पण ते दुसऱ्याचे व्यक्ती स्वतंत्र हिरावून घेणारे नसावे.आणि अपमान करणारे नसावे.
असेच मनातले काही

गावाकडील आठवणी

कालच पौर्णिमा झाली.शहरात काय अमावस्या आणि पौर्णिमा...

माझे लग्नाआधीचे आयुष्य खेड्यात गेले.भरपूर मोठे अंगण होते.बहुतेक सगळे रात्री 9 पर्यंत झोपायचे.माझ्या घरा जवळून नाशिक शिर्डी रोड गेलेला होता म्हणजे आज ही आहे.रात्री 9 वाजता नाशिक सोलापूर गाडी आली की 9 वाजले समजायचे.कारण घरात घडयाळ नव्हते.

गावाच्या ज्या भागात मी राहायचे त्या भागात मी 10 वीला जाई पर्यंत लाईट नव्हत्या.गावातून गेलेल्या रस्त्यामुळे गाव दोन भागात विभागले गेले होते.एक बाजू म्हणजे गाव आणि दुसरी बाजू म्हणजे खळवाडी.

खळवाडी म्हणजे सगळे खळे....त्यातच घरं....घराच्या मागच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला शेतात आलेले पीक ठेवले जायचे.धान्य तयार करायला खळे असायचे.असे अनेक घरे मिळून खळवाडी.
म्हणून आमच्या बाजूला लाईट उशिरा आलेली.आज आठवते जेव्हा लाईटचे पोल नुसते आले तरी आम्ही आनंदाने नाचलो होतो.परंतु घरात लाईट मात्र घेतली नव्हती माझे लग्न झाले तरीही.

हे सगळे आठवले कारण खूप दिवसांनी मुंबईत काल पूर्ण चंद्र बघितला.जो चंद्र रोज बघायला मिळायचा त्याचे दर्शन मुंबईत मात्र दुर्लभ झाले आहे.चंद्राला चांदोबा,चांदो मामा म्हणायचो.तो लहान असताना खूप आवडायचा कारण पौर्णिमेच्या आधी चार पाच दिवस व नंतर चार पाच दिवस त्याचा लख्ख आणि शांत प्रकाश सगळी कडे पसरायचा.त्या प्रकाशात अंधार गायब होऊन जायचा.अंगणात खेळता यायचे.बसून गप्पा मारता यायच्या.शेजारच्या खळ्यात जाण्यास भीती वाटायची नाही.घरातील दिव्याच्या प्रकाशा पेक्षा बाहेर जास्त प्रकाश असायचा.

कोणा कडे टीव्ही नाही रेडिओ नाही.घड्याळ नाही.एकदा अंधार पडला की सगळे स्वतःच्या घरात गुडूप होऊन जायचे.9 ची गाडी आली म्हणजे खूप उशीर झाला असे वाटायचे.चंद्रप्रकशात आजूबाजूची झाडे,घरे स्पष्ट दिसायचे.सगळे कसे स्थितप्रज्ञ वाटायचे.एक वेगळी शांतता होती.जी कायमची हरवली आहे.

आज सगळी कडे नुसता प्रकाश आहे.रात्री दिवसाचा भास होतो.पण हरवला आहे तो चंद्र....तो प्रकाश 
विसरलो आहे पोर्णिमीची वाट बघणे.
कधी तरी आठवणी गावच्या गल्ली बोळात घेऊन जातात.इतकंच.
असेच मनातले काही