Thursday, 6 January 2022

हौद

हौद 
खरे तर शहरात आता बघायला न मिळणारा...
खेड्यात कालबाह्य होत जाणारा....हौद

शेतकरी आणि बैल एक अतूट नाते होते.जेव्हा शेती हाच व्यवसाय होता.अगदी जेव्हा विहिरीवर मोटा चालायच्या तेव्हा प्रत्येक विहिरीवर एक हौद असायचा.तेव्हा तो दगडाने बांधलेला आणि चुना घालून पक्का केलेला असायचा.मोट वर आल्यावर आधी त्यात उपडी व्हायची नंतर त्याच हौदातून दंड पाडून पाणी शेतीला पाठवले जायचे.

दिवसभर माणसांना आणि शेतात राबणाऱ्या बैला साठी त्या हौदात पाणी असायचे.काळ बदलला आणि विहिरीवर विजेवर चालणारी मोटर (पंप)बसवले जाऊ लागले.पंप चालू झाल्यावर दिवसभराचे पाणी काही तासात उपसले जाऊ लागले.विहिरीतून पाणी बाहेर टाकणारा पंप व्यवस्थित राहावा म्हणून आणि पाण्याचा वेग रोखला जावा म्हणून हौद बांधला जाऊ लागला. जो पूर्णतः विटा आणि सिमेंटचा पक्का बांधलेला असे.पंप बंद झाला तरी त्यात भरपूर पाणी राहायचे.

एकदा पंप चालू झाल्यावर विहिरी मधील स्वच्छ पाण्याने भरून तो वाहायला लागला की भारी वाटायचा.जर एखाद्याची विहीर गावा शेजारी असेल तर त्यावर सकाळी सकाळी बाई माणसांची गर्दी व्हायची कोणाला पाणी न्यायचे असायचे तर कोणाला धुनी धुवायची असायची.लहान मुलांना त्यात डुबायला आवडायचे.विहिरीतील त्या स्वच्छ आणि थंडगार पाण्याचा स्पर्श खूप वेगळाच असायचा.

त्या हौदाने रोज अशी माणसांची किलबिल ऐकलेली असायची.मुलांचा आरडाओरडा ऐकलेला असायचा.कोणा सासुरवाशीणचे हुंदके ऐकलेले असायचे.तिच्या डोळ्यातील पाणी स्वता मधून सामावून ते प्रवाहित केले असायचे.तहानेने व्याकुळ झालेल्या गाई बैलांची तहान भागवली असायची.त्यांच्या गळ्यातील घुंगराचा आवाज ऐकलेला असायचा.कोणच्या तरी एकटेपणात त्याच्यात पाय सोडून बसलेल्या व्यक्तीच्या पायाला आपल्या स्पर्शने साथ दिलेली असायची.

भरलेला हौद त्यातून वाहणारे पाणी ...ते खाली दंडात पडताना होणारा त्याचा आवाज....उगाच त्यात हात घालून त्या पाण्याशी केलेला चाळा...आजूबाजूला डोलणारी पिके.सगळे कसे उल्हसित करणारे.

गाव सोडले शहरे जवळ केली.मनातून जात नाही ते गाव.
मग उगाच कुठे तरी मुलांना घेऊन रिसॉर्ट वर जायचे.क्लोरीन घातलेल्या आणि साठवून ठेवलेल्या त्या पाण्यात उड्या मारायच्या.मुला कडे बघून  खुश व्हायचे.मनाने मात्र आज स्वताचे अस्तित्व नसलेल्या त्या विहिरीवर त्या हौदा पाशी जाऊन यायचे.खिशात पाच पैसे नसताना केलेली ती मजा आठवायची.पुन्हा आपल्या कामाला लागायचे.

आजही शेतात तो हौदा आहे.पाणी नसलेली विहीर आहे.शेत करायला कोणी नाही म्हणून ओसाड पडून आहे.आता   ठिबकद्वारे पाणी शेताला दिले जाते.विहिरी ऐवजी बोरवेल घेतले जातात.

काळ बदलला आहे,बदलत आहे.कुठला तरी एखादा हौद गत काळाची आठवण मात्र देत असतो.
असेच मनातले काही.

No comments :

Post a Comment