आज गावे बदलली,गावांचे शहरीकरण झाले असे आपण बोलतो.आपण जिथे बालपण घालवले ते गाव बदलले बघून वाईट वाटते.मनाला वेदना होतात.नकळत मन भरून येते.त्याच वेळी आठवतात आपले आई वडील आणि आजूबाजूची त्यांच्या सारखी जुनी माणसे.मग वाटते आपण त्यांना खुप सहज बोलतो "तुमचा जमाना गेला"तेव्हा वेगाने बदलणारे हे जग बघून आपल्याला किती वेदना होतात त्याच्या हजार पट वेदना त्यांना होत असतील.
दोन तीन दिवसा पूर्वी एक आज्जी भेटल्या 80 वर्ष वय निरक्षर.आज ही स्वतःचे काम स्वता करतात.अगदी स्वतःचे जेवण स्वताच बनवतात.घरात सून असून देखील.आज्जी तुम्हाला पेन्शन असून तुम्ही का अजून काम करतात असे विचारले वर खूप सहज पणे बोलल्या ती पेन्शन कुठे माझ्या वाट्याला येते.म्हणजे त्यांना त्यांच्या पतीची पेन्शन भेटली ती घरात खर्च होते.खूप थोडे बोलल्या त्या पण जाताना दोन तीनदा संगीतले माझी सून भेटली तर बोलू नका मी काही बोलले.खरे तर मुंबईत घराचा नंबर माहिती असल्या शिवाय कुठे जात येत नाही.अश्या या शहरात कुठे मला त्यांची सून भेटणार होती.
आज्जी का घाबरतात एवढया यावर त्यांचे उत्तर होते,घाबरण्यात जन्म गेला.आधी सासुरवास काढला.सासूचे शेवट पर्यंत केले.आज जमाना एवढा बदलला आहे आज सुनेचे करायला लागते आहे.आमच्या वेळी नव्हते बाई असे.
या वाक्यात खूप काही वेदना असतात.
आज्जी निघून गेल्यावर खूप वेळ मनात विचार येत राहिले.लग्न झाले की सासरी गेल्यावर सासर हे आपले घर समजून आता येथेच आपला शेवट समजून आहे तसे जगत राहायचे.मग सासरी किती छळ झाला तरी तो सहन करायचा.घरातील मोठ्या माणसांना जीव लावायचा.त्यांचा आदर करायचा.मुलगा झाला की खुश व्हायचे.उद्या तो आपल्याला सांभाळणार म्हणून ......
पण गेल्या काही वर्षात वेगाने होणारे बदल यामुळे सगळेच बदलले.मोठ्यांचा आदर तर दूरच ते घरात नको झाले.मग ही मधली पिढी यात भरडली गेली.त्यांना बघून मनात येते त्यांचा काळ आणि आता होणारा बदल यामध्ये त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील ना.?
परिवर्तन जरुरी आहे,पण ते होताना खूप काही बदलते.त्याला समोर जाताना मागचे खूप काही सुटत जाते.
असेच मनातले काही.
आशा नवले
No comments :
Post a Comment